पुणे – राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुण्यात महायुतीत मोठी फूट पडली आहे. येत्या निवडणुकीत भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर लढणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत महायुती तुटल्याचे घोषित केले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणार असल्याचे आव्हान दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पुण्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने लढतील. या लढतीत दोन्ही पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा असेल, पण ती मैत्रीपूर्ण असेल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुण्यात भाजपाने पाच वर्षांत चांगला विकास केल्याचे आणि जनतेवर विश्वास असल्याचे म्हटले. जनता पुन्हा भाजपाला संधी देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
अजित पवारांचे आव्हान
पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जे विधान केले ते चर्चेनंतर केले असावे. त्यांनी विचारपूर्वक विधान केले असावे. त्यांनी २५ वर्षे महापालिकेची जबाबदारी सांभाळली आहे आणि शहराचा सर्वांगीण विकास केल्याचे लोकांनी पाहिले आहे. २०१७ साली राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता, तेव्हा बरेच नेते बाजूला गेले आणि भाजपाची सत्ता आली. महाविकास आघाडीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार होता. त्यामुळे स्थानिक विचार करून निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.
जनतेचा कौल आणि ईव्हीएम
अजित पवारांनी जनतेच्या मनात जे असते तेच घडत असते, असे म्हटले. जनता जर्नादन सर्वस्व आहे. कुणाला निवडून आणायचे हे लोक ठरवतात. निवडून एखादा पक्ष आला तर ते ईव्हीएम चांगले आहे असे बोलतात. पराभूत झाल्यावर ईव्हीएमवर दोष देणे बरोबर नाही. लोकसभेला राष्ट्रवादीला ३१ जागा पराभूत झाल्या आणि फक्त १७ जागा मिळाल्या. तेव्हा विरोधकांना ईव्हीएम चांगले वाटले. आम्ही ईव्हीएमबाबत काही बोललो नाही, तो जनतेचा कौल होता. लाडकी बहीण, शेतकरी योजनेने पाच महिन्यात निकालात बदल झाला तर लगेच ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. काही ठिकाणी दुबार नावे, तिबार नावे यावर सर्वांनी आक्षेप घेतले. मतदार यादीत घोळ झाल्यावर यादी बनवणाऱ्याने पारदर्शकता आणली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
भाजपा-शिवसेना युतीचे संकेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची चर्चा झाल्याचे सांगितले. महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी हे समोरसमोर लढतील, पण ती लढत मैत्रीपूर्ण असेल. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल, असे त्यांनी म्हटले.
Follow Us On
Read Also

