निटूर (जि. लातूर): लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात शुक्रवारी दुपारी अचानक भूगर्भातून आलेल्या गूढ आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. तालुक्यातील निटूर, कलांडी आणि डांगेवाडी या गावांमध्ये हा आवाज प्रकर्षाने जाणवला. यामुळे ९0 च्या दशकातील भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या असून, नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने आणि नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या घटनेत भूकंपाची कोणतीही नोंद झाली नसल्याचे स्पष्ट केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२:३५ ते १२:४५ वाजेच्या सुमारास निटूर आणि आसपासच्या गावांमध्ये जमिनीखालून मोठा आवाज ऐकू आला. हा आवाज इतका तीव्र होता की, अनेक घरांवरील पत्रे आणि घरातील भांडी हलल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. आवाजाचा जोर पाहून भूकंपाचा धक्का बसल्याच्या भीतीने लोक आपापल्या घरातून बाहेर धावत आले. शेतात काम करणारे मजूर आणि गावातील नागरिक रस्त्यावर जमले होते. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे परिसरात काही काळ तणावाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच निटूर येथील माजी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र धुमाळ, कोतवाल सतीश बसवणे आणि स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने दिल्ली येथील ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’ (NCS) या संस्थेशी संपर्क साधला.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने उपलब्ध असलेल्या सिस्मोमीटर रीडिंगची तपासणी केली. काही वेळातच प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आली की, सदर परिसरात किंवा लातूर जिल्ह्यात कोठेही भूकंपाची कोणतीही नोंद झालेली नाही. भूगर्भातील अंतर्गत हालचाली किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे असा आवाज येऊ शकतो, मात्र तो भूकंप नव्हता, हे स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भूगर्भातून येणाऱ्या आवाजाबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. भूकंपाची कोणतीही शक्यता सध्यातरी वर्तवण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी. जर पुन्हा अशा हालचाली जाणवल्या तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असेही सुचवण्यात आले आहे.
जरी प्रशासनाने भूकंपाची नोंद नसल्याचे सांगितले असले, तरी स्थानिक नागरिकांमध्ये भीती कायम आहे. विशेषतः निटूर, कलांडी आणि डांगेवाडी या भागातील लोकांनी सांगितले की, त्यांनी जमिनीखालून धक्के जाणवल्यासारखे वाटले. १९९३ च्या किल्लारी भूकंपाचा अनुभव घेतलेल्या या परिसरातील लोकांसाठी भूगर्भातून येणारा कोणताही आवाज चिंतेचा विषय ठरतो. स्थानिक पातळीवर महसूल विभागाचे कर्मचारी परिस्थितीचा आढावा घेत असून, नागरिकांशी संवाद साधत आहेत.
लातूर जिल्ह्याचा काही भाग हा भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने अशा घटना घडल्यावर नागरिकांची सतर्कता महत्त्वाची ठरते. मात्र, प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार सध्या काळजीचे कोणतेही कारण नाही. तांत्रिक तपासणीअंती भूकंपाची नोंद शून्य असल्याने नागरिकांनी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यास काहीच हरकत नाही.
Follow Us On
Read Also

