मुंबई: “मुंबईतील जमिनी केवळ आणि केवळ मुंबईकरांच्या हक्काच्या घरांसाठीच वापरल्या जातील, हा ठाकरेंचा शब्द आहे आणि तो आम्हाला जनतेसमोर सिद्ध करायचा आहे,” अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुंबईच्या भविष्याचा रोडमॅप मांडला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उद्धवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात मुंबईसाठीच्या १५ महत्त्वाच्या विकास योजनांचे सादरीकरण करण्यात आले.
उद्धवसेना भवन येथे पार पडलेल्या या बैठकीत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांशी संवाद साधला. हा केवळ निवडणुकीचा वचननामा नसून, सत्तेत आल्यानंतर महापौरांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवायची ही कामे आहेत, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सादरीकरणात मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित १५ प्रमुख मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
१. १ लाख परवडणारी घरे: मुंबईतील वाढत्या घरांच्या किमती लक्षात घेता, महापालिकेचे स्वतःचे स्वतंत्र ‘गृहनिर्माण प्राधिकरण’ स्थापन करून पुढील ५ वर्षांत १ लाख परवडणारी घरे मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
२. बेस्ट बस तिकीट दरवाढ रद्द आणि जुने मार्ग: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ बस सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी तिकीट दर ५, १०, १५ आणि २० रुपये असे मर्यादित ठेवले जातील. तसेच, बंद झालेले जुने बस मार्ग पुन्हा सुरू करण्यावर भर दिला जाईल.
३. वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार योजना: तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष आर्थिक साहाय्य योजना सुरू केली जाईल.
४. महिलांसाठी सन्मान निधी: घरोघरी काम करणाऱ्या महिलांच्या कष्टाची दखल घेत त्यांना दरमहा १५०० रुपये ‘सन्मान निधी’ देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
५. आरोग्य व्यवस्थेत क्रांती: मुंबईत नव्याने ५ वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जातील. तसेच, कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी महापालिकेचे स्वतःचे ‘अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय’ उभारले जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ‘हेल्थ केअर कंट्रोल रूम’ आणि पालिकेची स्वतंत्र रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असेल.
उमेदवारांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आपल्याकडे मुंबईकरांचे तन आणि मन आहे. ही निवडणूक केवळ जागा जिंकण्यासाठी नाही, तर मुंबईची अस्मिता टिकवण्यासाठी आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांना धमकावण्यात आले, अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला, मात्र आपण एकजुटीने मैदानात उतरलो आहोत. १६ तारखेला निकालानंतर तुम्हा सर्वांना पुन्हा याच उत्साहात इथे यायचे आहे.”
मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “आमच्या युतीमध्ये निष्ठा महत्त्वाची आहे. तिकीट न मिळालेल्या सहकाऱ्यांनी समजूतदारपणा दाखवत माघार घेतली, पण आमच्यातील कुणीही ‘एबी फॉर्म गिळला नाही’. हाच आमच्यात आणि विरोधकांमध्ये फरक आहे. तुम्ही निवडून येणे म्हणजेच मी निवडून येणे आहे.”
मुंबई महापालिकेची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. उद्धवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यातील हे नवे समीकरण मुंबईत किती यशस्वी ठरते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. “आम्ही केवळ आश्वासने देत नाही, तर ती पाळण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असेही यावेळी नेत्यांकडून सांगण्यात आले.
मुंबईचा विकास, प्रदूषण मुक्ती, आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी हे १५ मुद्दे गेमचेंजर ठरू शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Follow Us On
Read Also

