मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ (BMC Election 2026) साठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आता आम आदमी पक्षाने (AAP) देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, यामध्ये ‘केजरीवाल गॅरंटी’ (Kejriwal Guarantee) अंतर्गत मोफत वीज, पाणी, जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आरोग्य सुविधा देण्याचे मोठे आश्वासन दिले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या एकूण जागांपैकी सुमारे ७५ जागांवर आम आदमी पक्षाने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मुंबईतील भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या जनतेला एक नवा आणि पारदर्शक पर्याय देण्यासाठी ‘आप’ सज्ज असल्याचे पक्षाने म्हटले आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’ नेत्या आतिशी यांनी मुंबईत या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी त्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, ७५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असूनही मुंबईतील नागरी सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
केजरीवाल यांच्या ४ मुख्य गॅरंटी:
१. मोफत आणि २४ तास पाणी: प्रत्येक मुंबईकर कुटुंबाला दरमहा २०,००० लिटरपर्यंत मोफत नळ पाणी पुरवठा केला जाईल. तसेच, गळती रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून २४ तास शुद्ध पिण्याचे पाणी देण्याची हमी पक्षाने दिली आहे. सांडपाणी प्रक्रियेसाठी १०० टक्के कार्यक्षम यंत्रणा उभारण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
२. शून्य वीज देयक (मोफत वीज): दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर मुंबईतही ‘बेस्ट’ (BEST) मार्फत प्रति कुटुंब २०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. तसेच मोफत वीज मीटर बसवणे आणि सौर ऊर्जेवर भर देऊन वीज बिल शून्य करण्यावर ‘आप’चा भर असेल.
३. जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण: मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक शाळेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. पालिकेच्या शाळांमध्ये खासगी शाळांच्या तोडीच्या सुविधा पुरवल्या जातील. सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट बसचा मोफत पास आणि प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिनची सुविधा दिली जाईल.
४. १००० मोहल्ला क्लिनिक आणि मोफत आरोग्य: मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी १००० मोहल्ला क्लिनिक स्थापन केले जातील. येथे नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्ला, मोफत औषधे आणि सर्व प्रकारच्या चाचण्या उपलब्ध करून दिल्या जातील. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरच मुंबईकरांना दर्जेदार उपचार मिळतील, असा दावा पक्षाने केला आहे.
सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका जाहीरनामा प्रसिद्ध करताना आतिशी यांनी नमूद केले की, मुंबई हे जगातील श्रीमंत शहरांपैकी एक असूनही येथील प्रशासन केवळ भ्रष्टाचारात मग्न आहे. सत्ताधाऱ्यांनी बांधकाम क्षेत्रातील नफा लाटण्यासाठी पालिकेच्या शाळा मुद्दाम बंद केल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. मुंबईची प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यासाठी आणि शहराचे नियोजनबद्ध शहरीकरण करण्यासाठी ‘आप’चा जाहीरनामा हा एक ठोस आराखडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीत आता ‘मोफत’ सुविधांच्या आश्वासनांमुळे राजकीय लढाई अधिक रंजक होणार आहे. प्रस्थापित पक्षांसमोर आम आदमी पक्षाचे हे ‘दिल्ली मॉडेल’ किती प्रभाव पाडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Follow Us On
Read Also

