सातारा/बामणोली: “मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, याच दृष्टिकोनातून विरोधकांनी आजवर मुंबईकडे पाहिले. मात्र, आम्ही मुंबईचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोत. मुंबईपासून मराठी माणसं तोडणार ही विरोधकांची दरवेळचीच ‘घीसीपीटी’ कॅसेट आहे आणि मुंबईची जनता आता याला भुलणार नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
आपल्या मूळ गावी, सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईचा विकास, आगामी महानगरपालिका निवडणुका आणि लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आम्हाला महाराष्ट्र फास्ट तर मुंबई ‘सुपरफास्ट’ करायची आहे. विरोधकांनी केवळ भावनिक राजकारण करून सत्ता उपभोगली, पण आम्ही प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करत आहोत. मुंबईचा जो काही विकास गेल्या दोन वर्षांत झाला आहे, तो महायुती सरकारच्या काळातच झाला आहे. मुंबईची जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की केवळ पोकळ घोषणा देऊन चालत नाही, तर कामाची गरज असते. आम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवतो.”
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, “पूर्वी ठाकरे म्हणायचे की शिंदेसेना आणि एकनाथ शिंदे फक्त ठाण्यापुरते मर्यादित आहेत. पण आता नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही दाखवून दिले आहे की आमची ताकद चांदा ते बांदापर्यंत पोहोचली आहे. उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिले, ते राज्यात फिरले नाहीत, त्यामुळेच त्यांच्यावर आज ही वेळ आली आहे. मला त्यांच्यावर अधिक टीका करायची नाही, मी माझ्या कामाने त्यांना उत्तर देत राहीन.”
आगामी नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मुख्यमंत्री अत्यंत आशावादी दिसले. “नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहोत. या दोन्ही ठिकाणी शिंदेसेनेची ताकद मोठी आहे आणि आम्हाला तिथे घवघवीत यश मिळेल. मुंबई महानगरपालिकेतही यावेळेस महायुतीचाच झेंडा फडकेल आणि महायुतीचाच महापौर होईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी महिलांशी संवाद साधला. “विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे अनेक प्रयत्न केले.. कोर्टापर्यंत धाव घेतली. पण जोपर्यंत तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे सत्तेत आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही. उलट आम्ही ही योजना अधिक सक्षम करणार आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले.
दुर्गम कोयना आणि कांदाटी परिसराच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तापोळ्यातील ‘केबल स्टे ब्रिज’चे काम मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि उत्तेश्वर मंदिराचा परिसर पर्यटन दृष्टिकोनातून विकसित केला जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या उत्तेश्वराच्या चरणी लीन झाले. डोंगर चढून पायी प्रवास करत त्यांनी यात्रेत सहभाग घेतला. मध्यरात्री एक वाजता त्यांच्या हस्ते विशेष पूजा, अभिषेक आणि आरती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या संपूर्ण दौऱ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून घेरले असून, आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
Follow Us On
Read Also

