इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील भागीरथपुरा भागात पसरलेल्या दूषित पाण्याच्या संकटामुळे एका ५ महिन्यांच्या निष्पाप बालकाचा बळी गेला आहे. १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ज्या घरात पाळणा हलला होता, त्याच घरातील चिमुकल्याचा दूषित पाण्यामुळे झालेल्या आजाराने अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
काय आहे नेमकी घटना?
भागीरथपुरा येथील रहिवासी सुनील साहू यांना १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘अव्यान’ नावाचा मुलगा झाला होता. अव्यान अवघ्या ५ महिन्यांचा होता. त्याला बाहेरचे दूध पाजताना ते घट्ट वाटल्याने, आईने ते पातळ करण्यासाठी आणि बाळाला सहज पचण्यासाठी त्यात महानगरपालिकेच्या नळाचे पाणी मिसळले. मात्र, हेच पाणी त्या निष्पाप जीवासाठी काळ ठरेल, याची पुसटशी कल्पनाही त्याच्या पालकांना नव्हती.
नळाच्या पाण्याचा अंश पोटात गेल्यावर अव्यानला काही वेळातच उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. पालकांनी तातडीने त्याला बालरोगतज्ज्ञांकडे नेले आणि उपचार सुरू केले. मात्र, २९ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली.
प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर
भागीरथपुरा भागात केवळ अव्यानच नाही, तर गेल्या एका आठवड्यात १,१०० पेक्षा जास्त लोक उलट्या आणि जुलाबाच्या आजाराने बाधित झाले आहेत. यापैकी १५० हून अधिक रुग्णांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले आहे. प्राथमिक तपासणीत असे समोर आले आहे की, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गळती झाली होती आणि त्यातून जवळच असलेल्या नाल्यातील घाण पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले. यामुळे संपूर्ण परिसरात जलजन्य आजारांची साथ पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, या दूषित पाण्यामुळे आतापर्यंत भागीरथपुरा परिसरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेच्या या गंभीर निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासनाने आता कुठे तरी पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे, परंतु तोपर्यंत अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
आरोग्य विभागाचा इशारा
अशा घटना टाळण्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलांच्या बाबतीत विशेष खबरदारी घेण्याची गरज असून, दुधात किंवा अन्नात मिसळले जाणारे पाणी पूर्णपणे निर्जंतुक असावे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
ही घटना प्रशासकीय यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्या इंदूरमध्ये जर पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी मिसळून लोकांचा जीव जात असेल, तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
Follow Us On
Read Also

