मुंबई: सरत्या वर्षाला निरोप देऊन संपूर्ण जग २०२६ च्या स्वागतात मग्न असताना, मुंबईकरांना निसर्गाने एक आगळेवेगळे सरप्राईज दिले आहे. मुंबईच्या विविध भागांत १ जानेवारी २०२६ रोजी, म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन थंडीच्या दिवसांत आलेल्या या अनपेक्षित पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच धावपळ झाली असून वातावरणात गारवा अधिकच वाढला आहे.
पहाटेपासूनच पावसाची बॅटिंग
बुधवारी रात्री उशिरापर्यंत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करून अनेक मुंबईकर गाढ झोपेत असताना किंवा काही उत्साही नागरिक पार्ट्या आटोपून घरी परतत असताना पहाटेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), वाळकेश्वर, कुलाबा या भागांसह दादर, प्रभादेवी आणि लोअर परळ परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नवीन वर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीत होईल अशी अपेक्षा असताना, पावसाच्या आगमनाने मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का दिला.
चाकरमानी आणि प्रवाशांची त्रेधातिरपीट
गुरुवारी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्याने आणि कामाचा दिवस असल्याने पहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची या पावसामुळे मोठी गैरसोय झाली. अनेकांकडे छत्री किंवा रेनकोट नसल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानके आणि बस स्टॉपचा आडोसा शोधावा लागला. विशेषतः दादर आणि सीएसएमटी स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करून पहाटे घरी परतणाऱ्या तरुणांचीही या पावसात भंबेरी उडाली.
हवामानातील बदलाचा परिणाम
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मुंबईत साधारणपणे कोरडे आणि थंड हवामान असते. मात्र, यंदा अरबी समुद्रातील हवामानातील बदलांमुळे आणि स्थानिक दाबाच्या क्षेत्रामुळे हा अवकाळी पाऊस पडल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या पावसामुळे तापमानात घट झाली असून मुंबईत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर ‘मुंबई रेन’ची चर्चा
नवीन वर्षाची सुरुवात पावसाने झाल्याने सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी ‘Rain in Mumbai’ हॅशटॅगसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी या पावसाला नवीन वर्षाचा ‘शुभशकून’ मानले आहे, तर काहींनी वातावरणातील या लहरीपणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मुंबईच्या प्रदूषणात या पावसामुळे काही प्रमाणात घट होईल, अशी आशाही व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाचा इशारा
पुढील २४ तास मुंबई आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी सुरूच राहू शकतात, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Follow Us On
Read Also

