मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज एका बाजूला उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे प्रशासकीय नियोजनाचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. याचा फटका मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना बसला. विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर आपले नाव शोधण्यासाठी निवेदिता सराफ यांना तब्बल एक तास वणवण फिरावे लागले. या अनुभवानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे.
नेमका प्रकार काय घडला?
आज सकाळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवेदिता सराफ विलेपार्ले येथील नियोजित मतदान केंद्रावर पोहोचल्या. मात्र, तिथे असलेल्या अधिकृत मतदार यादीत त्यांचे नावच उपलब्ध नव्हते. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या एका मतदान केंद्रावर (केंद्र क्र. २५) जाण्यास सांगितले. तिथे पोहोचल्यावरही त्यांना नाव शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. “मी सेलिब्रिटी असूनही मला नाव शोधण्यासाठी एक तास लागत असेल, तर सामान्य माणसाने काय करावे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
कुटुंबाची वाताहत: एकाच घरातील नावे तीन केंद्रांवर
निवेदिता सराफ यांनी यावेळी मतदार यादीतील एका गंभीर तांत्रिक त्रुटीकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, “एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच केंद्रावर असणे अपेक्षित आहे. पण आजच्या यादीत माझ्या कुटुंबातील व्यक्तींची नावे चक्क तीन वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली गेली आहेत. पूर्ण सोसायटीचे गट पाडले असताना आमच्या बिल्डिंगचे नाव यादीत का नाही? सिरीज नंबर का लिहिलेला नाही?” या गोंधळामुळे मतदारांना एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर हेलपाटे मारावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाईल बंदीमुळे पुरावा देता आला नाही
मतदान केंद्राच्या आत मोबाईल नेण्यास सक्त मनाई असल्यामुळे तिथल्या गोंधळाचे आणि ढिसाळ कारभाराचे फोटो काढता आले नाहीत, याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “जर माझ्याकडे मोबाईल असता, तर मी तिथला गोंधळ जगासमोर मांडला असता,” असेही त्या म्हणाल्या.
मतदार यादीतील या गोंधळाचा फटका केवळ निवेदिता सराफ यांनाच बसला असे नाही. राज्याचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबालाही त्यांचे नाव शोधण्यासाठी तासभर प्रतीक्षा करावी लागली. एका मंत्र्यालाही मतदानासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर निवडणूक आयोगाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकशाहीचा उत्सव की मतदारांची छळवणूक?
निवडणूक आयोगाने ‘मतदान करा’ असे मोठे आवाहन केले होते, परंतु प्रत्यक्ष केंद्रावर गेल्यावर मतदारांना नावच सापडत नसल्याने अनेक नागरिक नाराज होऊन घरी परतत आहेत. निवेदिता सराफ यांचा हा संताप मुंबईतील हजारो मतदारांचे प्रतिनिधित्व करणारा ठरला आहे. विलेपार्ले परिसरात आज या मुद्द्यावरून मतदारांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळाला.
Follow Us On
Read Also

